केंदूर -या गावचे सुपूत्र बापूसाहेब थिटे हे तालुक्याचे आमदार आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री होऊन गेले; मात्र त्याच गावात आज एकही कायमस्वरूपी एसटी बस फिरकत नाही.
दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात पुणे महानगर पालिकेच्या बसच्या फेऱ्या होतात; मात्र या गावाचा एसटी महामंडळाला विसर पडला आहे. पूर्वी गावातून जाणारी लाखणगाव ते पुणे एसटी बस गेल्या अनेक वर्षांपासून गावात फिरकलीच नाही. गावातून अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्रापूर, वाघोली, पुणे ठिकाणी शिक्षण घेत आहेत. येण्या-जाण्यासाठी दुचाकीचा जीवघेणा प्रवास करत आहेत. गावात अनेकदा पंचायत समिती सदस्य, उपसभापती ते गृह राज्यमंत्री पदाची संधी मिळाली; मात्र दिवंगत राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाप्पूसाहेब थिटे यांच्या गावात एकही एसटी बस फिरकत नाही. गावपुढाऱ्यांना मात्र या गोष्टीचा विसर पडला असल्याचे दिसून येते. शाळकरी मुलांना पायी प्रवास करूवा लागतो त्याचबरोबर महिला, वृद्धांना देखील आशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या तसेच पुणे-नगर महामार्गाला जोडणाऱ्या केंदूर ते शिक्रापूर या नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरून एसटी बस सेवा सुरू झाल्यास करंदी, जातेगावसह केंदूरच्या ग्रामस्थांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- राजगुरूनगर आगारला आम्ही अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर एसटी बस सुरू झाली होती; मात्र 10, 15 दिवसांत महामंडळाला नफा होत नसल्याचे कारण देत प्रशासनाने एसटी बस सेवा बंद केली.
-वंदना ताठे, सरपंच केंदूर