गेहलोत यांचे टीकास्त्र: राष्ट्रपती राजवटीच्या शिफारसीचा निर्णय वाईट
जयपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अस्थिरता निर्माण केली. तो निर्णय वाईट आहे, असे टीकास्त्र राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी सोडले.
महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असेल तर ती हाताळून स्थिर सरकार स्थापण्याची निश्चिती करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे, असे गेहलोत येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. कॉंग्रेसने महाराष्ट्रातील आमदारांना काही दिवस जयपूरमधील रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यामुळे राजस्थानमध्येही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी चर्चेचा विषय बनल्या.
दरम्यान, भिन्न विचारसरणी असणाऱ्या शिवसेनेशी महाराष्ट्रात कॉंग्रेस हातमिळवणी कशी काय करू शकणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर गेहलोत उत्तरले, असे निर्णय महत्वाचे असतात. भविष्याचा विचार करून ते घ्यावे लागतात. कॉंग्रेसला सत्तेचा हव्यास नाही.
मात्र, स्थिर सरकारसाठी पक्ष प्रयत्नशील आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणी बैठकीत तपशीलवार चर्चा केली आहे. त्यातून महाराष्ट्रातील सरकार स्थापनेविषयी कॉंग्रेस नेते चर्चा करत आहेत. तिथे काय घडेल ते वेळ सांगेल, असे म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप मग्रुरीने राजकारण करत आहे. त्या पक्षाच्या राजवटीत प्रत्येक जण भयग्रस्त बनला आहे, असे गेहलोत म्हणाले.