आमदार संग्राम थोपटेंचा भोरवासियांना दिलासा
भोर- भोर शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. पुराच्या पाण्यात एक जलवाहीनी वाहून गेल्याने व एक जलवाहीनी आठ दिवसांपुर्वीच फुटल्याने पाणीपुरवठा खंडीत झाल्याने नीरादेवघर धरणाच्या डाव्या कालव्याची अभिजीत मंगल कार्यालयाजवळ 30 अश्वशक्तीच्या दोन मोटर्स बसवून कालव्याचे पाणी भोर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टाकीत फील्टर करुन दोन ते तीन दिवसांत भोर वासियांना पुरवले जाईल, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
भोर शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार थोपटे यांनी संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पाणी नियोजनाची माहिती दिली. या बैठकिला जलसंधारण विभागाचे शेलार, एमजीपीचे कुलकर्णी, भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे, सहाय्यक अभियंता संतोष चव्हाण, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, विठ्ठल दानवले आदि उपस्थित होते.
नीरादेवघर धरणाच्या कालव्याचे पाणी उपसण्याचा परवाना 2014 मध्ये घेण्यात आला असून भोर शहराला 24 तास ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा करण्याचा या मागे उद्येश होता, असे सांगुन भोर शहरातील 18 हजार नागरीकांना रोज 30 लाख लिटर पाणी लागते. भोर शहराचा पाणी पुरवठा पावसामुळे खंडीत झाला असल्याने भोर शहरातील नागरीकांची पिण्याचे पाणी समस्या निर्माण झाल्याने कालव्याची पाहणी करुन व कालव्यामध्ये धरणाचे पाणी सोडण्यासाठी तसेच वीज पुरवठा कामी अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. भोर शहरातील नागरिकांचा सध्या निर्माण झालेला पाणी प्रश्न तात्पुता मार्गी लावला जात असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.
भोर शहरातील 5500 नागरिकांना नळजोड दिलेले असून दररोज 30 लाख लिटर प्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, प्रत्येकी 70 लिटर पाणी आवश्यक असताना 12 लाख 60 हजार लिटर पाणी पुरवले जाते यामुळे पाण्याची अतिरीक्त नासाडी होत असते. ती नागरीकांनी टाळली तर शहराला 24 तास पाणी पुरवठा करणे सोपे होईल, असेही या वेळी आमदार थोपटे यांनी निदर्शनास आणून दिले.
- भोर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या भाटघर येथील पंपहाऊस मधील जलवाहीनी वाहून गेली आहे. जलवाहीनी बसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पुराचे पाणी अजूनही कमी न झाल्याने नवीन जलवाहीनी बसवण्यात आडथळे येत आहेत. दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
– डॉ. विजयकुमार थोरात,मुख्याधिकारी