सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांचे तहसीलदारांना निवेदन
जामखेड: जामखेड शहराला वरदान ठरलेल्या भुतवडा तलाव आजमितीस कोरडा पडल्याने तलावातील गाळ काढण्याच्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिले.
जामखेड शहरासह वाड्यावस्त्यांना भुतवडा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तलावात पाणी साठा कमी होता, त्यामुळे तलावाने मार्च महिन्यातच तळ गाठला होता. तलावातील संपूर्ण गाळ काढल्यास क्षमतेच्या 10 लक्ष दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची पातळी गाठता येईल. त्याचा फायदा जामखेड शहरातसाठी भविष्यात होणार आहे. सध्या भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढण्याची चांगली संधी असून, याबाबत प्रबोधन होण्याची गरज असून, शहरातील स्वयंसेवी संस्था, मंडळे, त्यासाठी मदत मिळेल. भूतवडा तलावातील गाळ गेल्या 40 वर्षा पासून काढलेला नव्हता. या तलावाची पाणीसाठवण क्षमता 119 दशलक्ष घनफूट आहे.
मागील वर्षी जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलाव येथील गाळ काढताना सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून त्यास पैसे दिले. या कामास 1 कोटी 10 लाख रुपये खर्च झाला. गाळ काढल्यानंतर पाणी पातळीमध्ये वाढ झाली. मात्र तलावातील सर्व गाळ निघाला नाही. त्यानंतर यंदा तलाव कोरडा पडल्याने गाळ काढण्याची चांगली संधी असून, काढलेला गाळ जामखेड व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी घेऊन आपल्या जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गाळ काढणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाली करून गाळ काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली.