- ई-मेल, ई-कम्प्लेंट यांचाही तक्रार व संपर्कासाठी वापर करण्याचे आवाहन
पिंपरी – “करोना’च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र नागरिकांनी अधिकाऱ्यांना अनावश्यक भेटणे टाळावे. आपली तक्रार वरिष्ठांसमोर मांडण्यासाठी ई-मेल किंवा ई-कम्प्लेंटचाही वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.
करोना विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने महापालिका मुख्यालयात नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. असाच निर्णय पोलीस आयुक्तालयात येणाऱ्या नागरिकांसाठी घेणार का, अशी विचारणा केली असता आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या कामात तफावत आहे. यामुळे नागरिकांना पोलीस आयुक्तालयात येण्यापासून रोखता येणार नाही. मात्र, नागरिकांनीही पोलीस आयुक्तालयात येण्याचे टाळावे. त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी ई-मेल किंवा ई-कम्प्लेंटचा वापर करावा. याद्वारेही त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.
आयुक्त बिष्णाई म्हणाले, “करोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका, आरोग्य, महसूल, पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहेत. पोलिसांचा संबंध थेट समाजाशी येतो. त्यांना प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करावे लागते. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तीन हजार “एन 95 मास्क’ आणि तीन हजार हातमोज्यांचे वाटप करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांचा सारखा राबता असतो. पोलीस ठाण्यात काम केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घरी जातात. यामुळे शहरातील सर्व पोलीस वसाहती, पोलीस कार्यालये आणि परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
संचारबंदी, जमावबंदी लागू नाही
प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी नाही. यापुढील काळात जमावबंदी लागू करायची किंवा नाही, याबाबत जिल्हाधिकारी आणि महसूल आयुक्त यांची समिती निर्णय घेईल. करोनाच्या रुग्ण आणि प्रसार याबाबत माहिती देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. मात्र करोनाबाबत अफवा सोशल मीडियावर पसरविण्याऱ्यांवरही आमचे लक्ष असल्याचे आयुक्त बिष्णोई म्हणाले.