मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचा उपाय म्हणून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची बांधली जात असणारी अटकळ अखेर फोल ठरली. पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेण्यास विरोध केला. हा निर्णय घेतल्यास मुलभूत सेवांवर आणखी ताण पडेल असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
राज्यातील अनेक मंत्र्यांनी लोकल सेवा बंद करावी असे मत मांडले. मात्र मुंबई पालिका आयुक्तांनी या म्हणण्यास विरोध दर्शवला. लोकल सेवा बंद केल्यास अन्य सेवांवर ताण वाढेल, असे ते म्हणाले. त्याच बरोबर हा निर्णय घेतल्यास जनतेच्या मनात विनाकारण घबराट निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने सर्व कार्यालये बंद ठेवणार असल्याचे सांगितले असले तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक बंद करणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र लोकलचे वेळापत्रक मेगा ब्लॉकप्रमाणे करण्यावर विचार चालू असल्याचे सांगण्यात आले.