पेठ – येथील परिसरात अनेक शेतकऱ्यांनी विविध जातीचे बटाटे
लागवड सुरू केली आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा विहिरींना पाणी आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी असून, त्यांनी बटाटा लागवड सुरू केली आहे.
सध्या बटाट्याला बाजारात प्रतिदहा किलोला 230 ते 250 रुपये बाजारभाव आहे, त्यामुळेच कारेगाव, पारगाव व पेठ (ता. आंबेगाव) परिसरात शेतकऱ्यांनी पुखराज व इतर जातीच्या बटाट्याची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. बटाटा हे पीक 50 दिवसांचे आहे. अलीकडच्या काळात वातावरणात एकसारखा बदल होत आहे, त्याचा दुष्प परिणाम पिकांवर होण्याची भीती येथील शेतकरी संजय धुमाळ, दिलीप पवळे यांनी सांगितले. सध्या खुरपणी, फवारणी व खते, औषधे, मजुरी यांच्यावर दर एकरी 30 ते 35 हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सातगाव पठार भागात कुरवंडी ते पारगाव दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बटाटे लागवड केली आहे. आता शेतकरी आपले बटाटा पीक चांगले यावे यासाठी खते, औषधे यांचा वापर करून फवारणी, खुरपणी कामे करण्यात सरसावला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले बटाटे काढून 15 दिवस ते एक महिना झाला आहे. त्यांना चांगला बाजारभाव मिळाल्याने एकरी एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. आतासुद्धा बाजारभाव चांगला आहे, असे शेतकरी संजय धुमाळ यांनी सांगितले.