कोल्हापूर: पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या लोकशाही दिनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 900 निवेदने दाखल झाली.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवावेत. होणार नसतील तरीही तसे त्यांना पत्राव्दारे कळवावे, असे निर्देश पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले. नागरिकांना ‘हे माझे सरकार आहे,’असे वाटले पाहिजे. हेलपाटे मारायला लागू नयेत अशा पध्दतीने अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करावीत, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या.
शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात तीनही मंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकशाही दिनाची सुरूवात करण्यात आली. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्यांबाबत निवेदने स्वीकारण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने उपस्थित होते.
अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध भागातील आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी शिस्तबध्द नियोजन केले होते.
आजच्या निवेदनामध्ये वैयक्तिक तक्रारींपासून विविध विभागांच्या संदर्भात सार्वजनिक समस्यांबाबतचा समावेश होता. पालकमंत्री श्री. पाटील, ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. यड्रावकर हे तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना करत होते.
पाणंद रस्ता खुला करणे, रस्त्यांची दुरूस्ती, मायक्रो फायनान्सचा प्रश्न, शिक्षण विभागाशी संबंधित, महापालिका, जिल्हा परिषद, कृषी, एसटी, महसूल, आरोग्य, इचलकरंजी नगरपरिषद अशा विविध विभागांशी संबंधित समस्या मांडल्या जात होत्या. अंध तसेच दिव्यांग अर्जदारही आपल्या समस्या मांडत होते.