200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
परिंचे/नीरा- वीर धरणातून नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे नीरा नदीला प्रचंड पूर आला आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी व नीरा देवघर या धरणातील पाणी वीर धरणात येत असल्यामुळे धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडले आहेत. रविवारी (दि. 4) सायंकाळी 70 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यामुळे नीरा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
वीर धरणातून शनिवारी रात्रीपासून नीरा नदीत साठ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांतील लोक वस्त्यांमध्ये काही प्रमाणात पाणी शिरले होते. रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून 70 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निरा शहरातील वॉर्ड नंबर 1 मधील गोपाळवस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले असून येथील 70 कुटुंबांतील सुमारे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांना प्राथमिक शाळेच्या इमारतीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, महसूल विभाग, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
नीरा नदीत आलेल्या पुरामुळे सातारा जिल्ह्याला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे. नवीन पुलामुळे वाहतूक सुरळीत असली तरी जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर नव्याने बांधण्यात आलेल्या दत्त घाट व दत्त मंदिर सुद्धा शनिवारी रात्रीपासूनच पाण्याखाली गेला आहे. लोणंद निरा येथील पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. जुन्या पुलावर जाणारे सर्व मार्ग बॅरेगेट लावून बंद करण्यात आले आहेत.
वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला असून वीर ते लोणंद रस्त्यावरील पूल संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. सदर रस्ता बंद करण्यात आला असून रस्त्यावर बॅरिकेट, सतर्कतेचे आवाहन करणारे फ्लेक्स, लाल झेंडे लावले आहेत. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस हवालदार कुंडलिक माने, पोलीस नाईक महेश खरात, पोलीस शिपाई कैलास सरक, किसन काणतोडे यांनी पावसात उभे राहून लोकांना मदत केली.
- नीरा नदीला जास्त पाणी आल्यावर वॉर्ड नंबर 1मधील गोपाळवस्ती पाण्याखाली जाते. या ठिकाणी 60 ते 70 कुटुंबे राहतात. त्यामुळे रात्री ग्रामपंचायत, महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच पोलीस यंत्रणा यांनी या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्यांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था केली आहे
राजेंद भास्कर, पोलीस पाटील, नीरा