उध्दव ठाकरे ; तुमच्या शेखरच्या कायम पाठीशी
सातारा, दि. 18 (प्रतिनिधी)-
माण- खटाव तालुक्यातील जनतेचे लाडके शेखरभाऊ गोरे यांच्या प्रचारासाठी खराब हवामानामुळे येऊ शकलो नाही. याबद्दल तुम्हा सर्वांची मी दिलगीरी व्यक्त करतो. मात्र, काळजी करू नका, मी नक्की येतोय तुमच्या भेटीला असे सांगतानाच तुमच्या शेखरच्या कायम पाठीशी राहीन असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी होणारी सभा रद्द झाल्यानंतर ठाकरे यांनी दूरध्वनीवरून जनतेशी संवाध साधला.
शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ दहिवडीत शुक्रवार दि.18 रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार होती. सभेसाठी शिवसेनेच्यावतीने जय्यत तयारीही करण्यात आली होती.
सकाळपासूनच कार्यकर्ते व नागरीकांच्या वाहनांचे ताफे सभास्थळाकडे येत होते. सभास्थळी नागरीकांनी गर्दी केली असतानाच अचानक शेखरभाऊ गोरे यांना खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्याने सभा रद्द करावी हे सांगाणारा फोन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. यावेळी जमलेल्या सर्वांना ठाकरे यांनी मोबाईलवरून संबोधीत केले .
यावेळी ठाकरे म्हणाले , जनतेने नाराज होऊ नये.
आज आलो नसलो तरी मी उद्या सकाळी दहा वाजता तुमच्या भेटीला नक्की येणार आहे. तसेच माझ्या न येण्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नका, उध्दव ठाकरे कधी सेटिंग करत नाही. विरोधकांचा समाचार घेण्यासाठी व आपले अधिकृत उमेदवार शेखरभाऊ गोरे यांना आमदार करण्याचा निर्धार करून तुमच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले. त्यावेळी सभास्थळावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
त्यांनतर शेखरभाऊ गोरे म्हणाले , आपण सर्वजण सभेसाठी आलात परंतू खराब हवामानामुळे उध्दव ठाकरे साहेबांचे हेलिकॉप्टर टेकऑफ करू शकले नाही. पण ते आपल्यासाठी शनिवारी (दि.19) पुन्हा येणार आहेत . पाऊस व खराब हवामानामुळे तुमची निराशा झाली असेल पण नाराज न होता नव्या जोमाने आपण उद्या त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.
मला या दुष्काळी तालुक्यांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न, रोजगाराचा प्रश्न , महिलांच्या समस्यांसह विविध विषय त्यांच्यासमोर मांडून त्यांच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत. आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने या जाहीर सभेसाठी उपस्थित राहून उध्दवजी यांचे स्वागत मोठ्या संख्येने करू असे आवाहन शेखरभाऊ गोरे यांनी केले आहे.