जलसंधारण कामांना प्रारंभ ः लोकसहभागासह कंपन्यांची घेणार मदत
रांजणगाव गणपती -गेली 25 वर्षांपासून कोंढापुरी व पंचक्रोशीमध्ये न जाणवणारा दुष्काळ गेल्या दोन-तीन वर्षांपासून हळूहळू व ह्यावर्षी अधिकच झटका देणारा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई गावासमोर आ करून उभी असून याबाबत गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ जलसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी केले.
कोंढापुरी (ता. शिरूर) येथे जलसंधारण कार्यक्रमाचा शुभारंभ गायकवाड यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच नंदाताई ढसाळ, माणिक आबा गायकवाड, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, निळूभाऊ गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, अर्जुन गायकवाड, संतोष गायकवाड, राहुल दिघे, नानासो गायकवाड, सतीश गायकवाड, पोलीस पाटील, ग्रामसेवक, गंगाधर देशमुख, राजेश गायकवाड, संजय गायकवाड, किसन गायकवाड, आदींसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.
गेल्या चार-पाच वर्षांपासून हळूहळू जाणवणारा दुष्काळ यावर्षी अधिक प्रमाणात जाणवत असून हा भविष्यातील भीषण पाणी टंचाई, जाणवणारा दुष्काळ होईल. यावरच तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, युवा वर्ग, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कोंढापुरी औद्योगिक वसाहतीतील कंपनीकडून यंत्रसामग्री मिळवून ओढा खोलीकरण, तलाव खोलीकरण, बांध बंदिस्त लोकसहभागातून करावयाचे ठरले व कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन समिती तयार करून हे काम राजकारण विरहित करावे असे ठरले. 1 मे रोजी कोंढापुरी येथे ओढा खोलीकरण कामाचा शुभारंभ झाला. या निमित्ताने गावातील सर्व ग्रामस्थ यांनी कामाचे कौतुक केले व काम चांगल्या दिशेने होत असून याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होणार आहे व खोलीकरण करणे ही काळाची गरज आहे, असे सर्वांनी सांगितले.
- गावचे पाणी गावातच आडवा
गावचे पाणी गावातच आडवा असा संदेश यावेळी ग्रामस्थांनी दिला. तसेच गावामध्ये दोन मोठे तलाव, अनेक नाले असूनसुद्धा आज गावाला पाणी पिण्यासाठी नाही म्हणजेच “धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी आज परिस्थिती झाली आहे.