बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला असणाऱ्या ओडिशा या राज्यात विणल्या जाणाऱ्या अनेक साड्यांना संबळपुरी म्हणतात.अर्थातच संबळपूर नावाच्या गावामध्ये हातमागावर ही साडी तयार होते. संबळपूरच्या आजूबाजूला बारगढ, बारपल, बालंगीर जिल्हा, बौध जिल्हा या गावांमधूनही संबळपुरी साड्या तयार होतात. पण त्या त्या गावांनी आपली स्वत:ची ओळख म्हणूत त्या साडीमध्ये काही लहान वैशिष्ट्ये घातली आणि त्यातून संबळपुरी या एकाच साडीचे चार ते सहा वेगवेगळे प्रकार तयार झाले. त्यांना नावं मात्र त्या त्या गावांवरून देण्यात आली.
इसवी सन 1192 मध्ये उत्तर भारतामधून चौहानांच्या राज्याचा अस्त झाल्यानंतर तिथला भुलिया समाज पूर्व भारतात जिथे मुघलांचं राज्य होतं तिथे म्हणजे आताच्या ओडिशामध्ये स्थायिक झाला. तेव्हापासून 1925 सालापर्यंत या भुलिया समाजानं इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विणून ही कला नावारुपाला आणली. पूर्वी या साड्या थायलंड आणि इंडोनेशीया या देशांमध्येही निर्यात व्हायच्या, असे उल्लेख आहेत. त्या काळी त्या साड्यांना भुलिया कपटा म्हणजे भुलियांनी विणलेलं वस्त्र असं म्हणायचे. पण नंतर काळाच्या ओघात त्याला संबळपूर गावावरून संबळपुरी नाव पडलं आणि 1980 च्या दशकात तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या साड्या वापरल्यामुळे सगळ्या भारतातच त्या प्रसिद्ध झाल्या.
या साड्या सुती, रेशमी आणि गर्भरेशमी या तीनही प्रकारात तयार होतात. इकत प्रकारामध्ये यांवर तयार होणारी नक्षी आधी कागदावर चितारली जाते आणि मग त्याप्रमाणे धाग्यांना रंगवून ते धागे त्या नक्षी प्रमाणे विणले जातात आणि हे धागे रंगवण्यापूर्वी बांधले जातात त्यामुळे त्यांना काही ठिकाणी बंधनही म्हटलं गेलं आहे. या कापडात वापरला जाणारा धागा मध्यम ते जाड या प्रकारातला असल्यामुळे त्याच्यावर अनेक प्रकारे काम करता येतं. संबळपुरी हा प्रकार कोणताही नक्षीचा आणि विणकामाचा प्रकार आत्मसात करुन घेण्यात लवचिक असल्यामुळे बॉलिवूडच्या फॅशन डिझायनर्सचा आवडता प्रकार आहे. त्यामुळे हा आपल्या बॉलिवूडनं उचलून धरलेला सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणावा लागेल.
ओडिशा हे मुळात समुद्राकाठी वसलेलं राज्य असल्यामुळे तिथल्या कलेमध्ये समुद्रातले मासे, शंख, शिंपले, फुलं, चक्रं आणि पशू-पक्ष्यांचे आकार येणं साहजिकच आहे. संबळपुरी साड्यांचे अनेक प्रकार आहेत.
भुवनेश्वरपासून 156 किलोमीटर्सवर असणाऱ्या बोमकाई या गावात तयार होणाऱ्या साडीला बोमकाई याच नावानं ओळखलं जातं. नंतर हा प्रकार सोनेपूरमध्येही तयार व्हायला लागला त्यामुळे तिला सोनेपुरीही म्हणतात. हा प्रकार भारतातल्या जवळपास सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. या साडीवर आणि तिच्या काठांवर मासे, रुखा म्हणजे मुसळ, डमरू, कंठी फुलं, मोर अशी अनेक चिन्हं असतात. साडीच्या मधल्या भागापेक्षा हीचे काठ जास्त भरीव असतात. काठ हे पदराच्या विरुद्ध रंगाचे असतात म्हणून या प्रकाराला मुहाजोरी म्हणतात. या साड्या विणलेल्या सतरंजीसारख्या दिसतात.
बोमकाई हा साडीचा प्रकार सर्वात जास्त उत्क्रांत प्रकार मानला जातो. ऐश्वर्या राय हिनं आपल्या लग्नात बोमकाई या प्रकारची साडी नेसल्याची प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती. यातलाच दुसरा प्रकार म्हणजे बापटा. यात दोन म्हणजे बा आणि पटा म्हणजे वस्त्र किंवा धागे वापरले जातात. म्हणून याला बापटा असं नाव पडलं असावं. या साडीत सुती आणि रेशीमाचे असे दोन्ही धागे वापरतात. या साडीवर एक आड एक असे दोन रंगांचे उभे पट्टे असतात त्यावरूनही तिला बापटा म्हटलं जात असावं. शिवाय यात सोनेरी धागे वापरले असल्यानं या साडीचं सौंदर्य अजूनच वाढतं. या साड्या सणावाराला नेसल्या जातात.
बारपाल हा साडीतला तिसरा प्रकार आहे. संबळपूरपासून 70 किलोमीटर्स वर असलेल्या बारगढ जिल्ह्यात येणाऱ्या बारपाल या गावाच्या नावावरुन या साडीला हे नाव पडलं. या साडीला संबळपुरी इकत असेही म्हणतात.
पासापाली हा संबळपुरी साडीचा अजून एक प्रकार यावरच्या ध्युत या खेळाच्या पटासारखा दिसतो. फासा या शब्दाचं हे अपभ्रंश असावं. काळ्या पांढऱ्या किंवा लाल पांढऱ्या चौकटी हे या साडीचं वैशिष्ट्य आहे. पाटली हाही संबळपुरी साडीचा प्रकारतिच्या वैशिष्ट्यपूर्ण नक्षीमुळे प्रसिद्ध आहे. या प्रचंड वैविध्य असलेल्या सगळ्याच संबळपुरी साड्यांचं वैशिष्ट्यं म्हणजे यांच्यावर शहरी जीवनापासून लांब असणाऱ्या लोककलेचा आणि आदिवासी कलेचा असलेला छाप आपल्याला एक प्रकारच्या साधेपणातून समृद्धीचीच शिकवण देतो असं वाटायला लागतं.
अमृता देशपांडे