माजी आमदार अशोक पवार यांचा इशारा
न्हावरे- शिरुर तालुक्यातील महत्त्वाच्या उपयुक्त जलस्रोतांचे प्रशासनाने प्राधान्यक्रमाने पशुधन, पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करून वितरण करावे.प्रामुख्याने घोडधरणातून रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी होणारा पाणी पुरवठा बंद करावा; अन्यथा बुधवार (दि.5) पासून शिरुर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिरुर – हवेलीचे आमदार, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले की, सद्यस्थितीत तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून 24 तास एक्स्प्रेस फीडरद्वारे रांजणगाव औद्योगिक वसाहतीसाठी घोड धरणातून मृत पाणी साठ्याचा अहोरात्र उपसा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास घोड धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना दुर्भिक्ष्य जाणवू शकते.
शिरुर तालुक्यात काही वर्षांत जूनमध्ये पाऊस होत नसल्यामुळे घोड धरणातून औद्योगिक कारणासाठी होणारा पाणी पुरवठा तातडीने बंद करून पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील साठा आरक्षित करण्यात यावा, या मागणीवरच आम्ही ठाम आहे. संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी; अन्यथा उपोषणाचा इशारा पवार यांनी दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, संबंधीत विभाग व शिरुर पोलिसांना देण्यात आले आहे.
- नियोजनाअभावी शेतकरी कंगाल
शिरुर तालुक्यात चासकमान कालव्याच्या पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शिरुरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. न्हावरे, कोकडेवाडी, उरळगाव, निर्वी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. केवळ वर्षभर पाण्याच्या चुकीच्या वितरणमुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप पवार यांनी केला.