नवी दिल्ली : आरेमधील झाडांना काश्मिरींच्या आयुष्यापेक्षा अधिक महत्व आले आहे, अशा शब्दात जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्र सरकार काश्मिरींचा मुलभूत हक्क हिसकावून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कार्यकर्त्यांनी आरेतील जंगलतोड थांबवली याचा आनंदच आहे. मात्र, अशाच स्वरुपाच्या काश्मिरींच्या मुक्त संभाषण आणि अभिव्यक्तीचा अधिकार का हिसकावून घेतला जातो, याचे आश्चर्य वाटते. नभारताच्या अन्य नागरिकांमध्ये आणि काश्मिरींमध्ये भेदभाव करत नसल्याचे भारत सरकार म्हणते. पण, प्रत्यक्षात ते मुलभूत अधिकारही देत नाहीत, अशा आशयाचे ट्विट मुफ्ती यांनी केले आहे.
दरम्यान काश्मिरात 62व्या दिवशीही जनजीवन विसकळीतच होते. बहुतांश बाजारपेठा बंद होत्या. रस्तावर वाहने नव्हती,असे वृत्त पीटीआयने दिले आहे. राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. मुफ्ती या काश्मिरातील अनेक नेत्यांसह घरात नजरकैदेत आहेत. काल फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांची नॅशनल कॉन्फरन्सच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती.