कराड (प्रतिनिधी) – करोना ग्रस्तांची संख्या जगभरात वाढत असलीतरी सातारा जिल्ह्यात प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे संक्रमणाचा आकडा थांबलेला दिसतोय. तरी सुद्धा संकट टळलेले नाही. या पार्श्वभूमीवर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील भाजीपाला मार्केट मध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत जनजागृती केली.यावेळी मनोहर शिंदे, शिवराज मोरे, झाकीर पठाण, राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, प्रदीप जाधव, आर. जी. लुनिया, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, करोनाला हरवायचे आहे हे आम्ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठामपणे ठरविले आहे. यासाठी शक्य तितके प्रयत्न आम्ही करत आहोत. या प्रयत्नांना जनता सुद्धा साथ देत आहे. तरी सुद्धा गरजेच्या वस्तूंसाठी लोक घरातून बाहेर पडतच आहेत. अशा लोकांमध्ये करोनाबाबत जागृती व्हावी यासाठीच मी आज कराड शहरातील विविध भागात संवाद साधत आहे. करोनाचे संकट फार गंभीर आहे. हे संकट गांभीर्याने घ्या. अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा. आणि बाहेर पडताना तोंडाला मास्क बांधा, ठराविक अंतर ठेवा, हात वारंवार साबणाने धूवा अशा सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून करत आहे.
दरम्यान, करोनाला हरविण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासन, डॉक्टर्स, हॉस्पिटल कर्मचारी,पोलीस यंत्रणा, अंगणवाडी सेविका आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यांना साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठीच सर्वांनी स्वतःच्या व देशाच्या सुरक्षिततेसाठी घरीच राहा, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.