वळसे पाटील यांचे गौरवोद्गार
मंचर- हुतात्म्यांच्या कार्यामुळे महाळुंगे पडवळ गावचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात उज्वल झाले आहे. क्रांतिकारांची आठवण नेहमीच जागृत ठेवून त्यांचे कार्य स्मरण केले पाहिजे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे क्रांती दिनानिमित्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकाला अभिवादन करुन एन.सी.सी. पथकाच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तसेच हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या संक्षिप्त माहिती फलकाचे उद्घाटन त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसी भोर, उपविभागीय अधिकारी संजय पाटील, सरपंच अनिल सैद, माजी सरपंच अरुण चासकर, दीपक चासकर, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक पी. डी. सैद, अण्णासाहेब पडवळ, किसन सैद, बी. टी. आवटे, डॉ. विठ्ठल चासकर, मकबूल इनामदार, गणेश आवटे, प्रशांत सैद यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमात प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक आत्माराम जगदाळे यांनी केले.