- ठेवीवरील व कर्जावरील व्याजदरात कपात
- एसएमएस शुल्कही केले रद्द
- इतर बॅंकाही अनुकरण करण्याची शक्यता
मुंबई : भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी बचत खात्यातील किमान ठेवीची अट रद्द केली आहे. त्याचबरोबर एसएमएस शुल्कही रद्द केले आहे. आता इतर बॅंकाही स्टेट बॅंकेच्या निर्णयाचे अनुकरण करण्याची शक्यता आहे.
बॅंकेने बचत खात्यातील रकमेवरील व्याजदरात कपात केली आहे. बॅक अगोदर या खात्यातील 1 लाखापर्यंतच्या रकमेवर सव्वा तीन टक्के तर 1 लाखावरील रकमेवर 3 टक्के व्याज देत होती. आता सरसकट 3 टक्के व्याज देणार आहे. याचा 44.51 कोटी खातेदारावर परिणाम होणार आहे.
बॅंकेतील बचत खात्यात अगोदर 3 हजार रुपयापर्यंत किमान रक्कम ठेवावी लागत होती. अन्यथा बॅंक दंड आकारीत होती. मात्र आता किमान रकमेची अट रद्द करुन टाकण्यात आली आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या कर्जावरील व्याजदरातही 0.15 टक्क्यापर्यंत कपात जाहीर केली आहे. ही कपात एमसीएलआर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेसड् लेंडिंग रेटमध्ये करण्यात आली आहे. कपात दहा मार्च पासून लागू झाली आहे.
बॅंकेने एक वर्षासाठीचा एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी कमी करून तो 7.75 टक्के केला आहे. तो अगोदर 7. 85 टक्के इतका होता. या आर्थिक वर्षात स्टेट बॅंकेने केलेली ही 10 वी व्याजदर कपात आहे. बॅंकेचा ओव्हर नाइट आणि एक महिन्यासाठीचा एमसीएलआर 0.15 टक्क्यांनी कमी करून तो 7.45 टक्के करण्यात आला आहे.
तीन महिन्यासाठीचा एमसीएलआर 7.65% यावरून 7.50 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षासाठीचा एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी कमी करून 7.95 टक्के करण्यात आला आहे. तर तीन वर्षासाठीचा एमसीएलआर 0.10 क्क्यांनी कमी करून तो 8.05 टक्के करण्यात आला आहे. सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बॅंकेने एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी कमी केला होता.