सातारा: बारामतीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बारामतीला नीरा डाव्या कालव्यातून बंद करण्यात आलेल्या पाणी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून दूर ठेवण्यात आले असल्याचे उदयनराजे म्हणाले. पाण्याच्या मुद्यावर उद्यनराजेंनी नेमका कुणावर निशाणा साधला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणी मिळणार नाही असे सांगून काही राजकीय मंडळी जे जिल्हा परिषदेत आहेत. त्याचबरोबर राज्य पातळीवर पद भोगणारे, या सगळ्यांच्या संगनमताने ज्या धरणग्रस्तना खंडाळा तालुक्यात जमिनी मिळाल्या त्यांची दिशाभूल करून ह्या क्रियानिष्ठ संकोचित बुद्धीच्या लोकांनी जमिनीचे व्यवहार केले असल्याचे उदयनराजे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात गाजलेल्या नीरेच्या पाण्याचा प्रश्न मतमोजणीनंतर अवघ्या काही दिवसातच दोन रणजितसिंहांच्या तगाद्यामुळे जलसंपदा विभागाने सोडविला असून बारामती व इंदापूरला जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला माळशिरस, फलटण, सांगोला व पंढरपूरकडे वळविण्याचा अध्यादेशच आता काढण्यात आला आहे.
दरम्यान यामुळे नीरा डावा कालवा लाभक्षेत्रात नाराजीचा सूर असला तर उजवा कालवा परिसरात मात्र आनंदाचे वातावरण आहे.माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला सर्वाधिक मताधिक्क्य ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिले त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माळशिरस, माढा, सांगोला व फलटण तालुक्याला पाण्याची भेट दिली असल्याची चर्चा रंगली आहे. वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के व डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते.