नवी दिल्ली – आसाम आणि बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली असून या स्थितीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. ही स्थिती प्रभावीपणे हाताळण्यात सरकारला अपयश आल्याची टीकाही विरोधकांनी आज लोकसभेत केली. कॉंग्रेस सदस्य गौरव गोगोई यांनी आसामातील पूरस्थितीचा विषय सभागृहात उपस्थित करताना सांगितले की आसामात आलेला पूर ही राष्ट्रीय आपत्ती आहे. तेथील संकट गंभीर असून 43 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. पंधरा जणांचा यात मृत्यू झाला आहे.
बिहारमध्येही अनेक ठिकाणी पूर आला असून सरकारने तेथील पूरग्रस्तांना कोणतीही मदत देऊ केलेली नाही अशी तक्रार कॉंग्रेसचेच मोहंमद जावेद यांनी केली. ते म्हणाले की पूरग्रस्त भागात अन्न मिळणे दुरापास्त झाले असून लोकांना अक्षरश: उंदीर मारून दिवस काढावे लागत आहेत असे ते म्हणाले. तथापी कॉंग्रेसचे सदस्य सभागृहाची दिशाभुल करीत आहेत असा दावा भाजपचे रामकृपाल यादव यांनी केला. ते म्हणाले की केंद्र सरकारने बिहारला आत्तापर्यंत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 261 कोटी रूपयांचा निधी दिला असून राज्य सरकार व केंद्र सरकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व शक्य ती उपाययोजना करीत आहेत असा दावा त्यांनी केला.