5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा अनावश्यक बोलबाला
नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारतीय अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेण्याचे दिशानिर्देशन नाही. त्याचबरोबर आवश्यक आर्थिक सुधारणाकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष केले गेले असल्याचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत सांगितले.
अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना चिदंबरम म्हणाले की, सीतारामन यांनी अर्थसंकल्पात स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी दिलेली नाही. या आकडेवारीत सरकारला मिळणाऱ्या महसुलाचा हिशोब नाही. याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती समजू शकली असती. अर्थव्यवस्थेवर भाष्य नसल्यामुळे या अर्थसंकल्पाला काही अर्थ उरलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय उत्पन्न नेमके किती आहे आणि किती वेगाने वाढणार आहे याबद्दलही संदिग्धता आहे. काही ठिकाणी विकासदर सात टक्के असल्याचे म्हटले आहे तर काही ठिकाणी विकासदर आठ टक्के असल्याचे म्हटले आहे. एका देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाबाबत 1 टक्क्यांचा फरक फार मोठा असतो असे त्यांनी सांगितले. सध्याच्या विकासदराने भारताची अर्थव्यवस्था 5 वर्षात 5 ट्रिलियन डॉलरची होणार असतानाही सरकार उगीचच बोलबाला करीत आहे.