या लघुपटाची सुरुवात गीता आणि लक्ष्मण या वृद्ध जोडप्यापासून होते. गीता आणि लक्ष्मण यांच्यात संवाद सुरु असतानाच दाराची बेल वाजते.
दरवाजामध्ये लक्ष्मणची नैना आणि नमन अशी दोन छोटी नातवे आलेली असतात. घरात गीताला पाहून नमन विचारतो, या कोण आहेत? यावर माझी मैत्रीण असल्याचे उत्तर लक्ष्मण देतात. तेवढ्यात नमनाला करपल्याचा वास येतो. लक्ष्मण घाई-गडबडीत स्वयंपाकघरात जातात आणि खिरीचा गॅस बंद करतात.
नैना लक्ष्मणसोबत स्वयंपाकघरात जाते आणि त्यांना हळूच विचारते की, तुमची मैत्रीण असल्याचे आईला माहिती आहे का? तुम्ही आजींना रिप्लेस करणार आहेत. हे ऐकून लक्ष्मण चिडूनच नैनाला म्हणतो, तुम्ही मनात काहीही येते ते बोलता का? हे ऐकून नैना शांतपणे बाहेर जाऊन बसते.
लक्ष्मण सर्वांसाठी खीर घेऊन येतात. आणि नमनाला नैनाला देण्यास सांगतात. नमन तिला खीर देण्यास जातो. तेव्हा नैना त्याला म्हणते, तुला माहितीये का त्या काकू आजोबांची गर्लफ्रेंड आहेत. यावर नमन तिला विचारतो, तू तुझ्या बॉयफ्रेंडबद्दल का नाही सांगितले. नैना रागाने त्याला गप्प बसविते आणि आदित्य माझा बॉयफ्रेंड नसल्याचे सांगते. हे ऐकून नमन तिला म्हणतो, मी आदित्यचे नाव घेतलेच नाही? नैना नमनला निघून जाण्यास सांगते. नंतर लक्ष्मण नैनाला समजविण्यास बाहेर आला असता नैना त्यांना विचारते, तुम्हाला त्या काकू आवडतात ना? यावर लक्ष्मण म्हणतो तु आदित्यबद्दल सांग मी काकूंबद्दल सांगतो.
बहुतेक वेळा आपल्याकडे असे मानले जाते की प्रेम हे फक्त तरुण लोकांसाठी आहे. परंतु आपण एक गोष्ट विसरत असतो कि, प्रेमाला वय, जात, रंग किंवा पंथ यांचे बंधन नसते. लोक वृद्ध वयात प्रेम करतात तेव्हा नेहमीच हे निषिद्ध का आहे? याचा विचार आपण करायला हवा.