कात्रज जुना घाट रस्ता : अपघाताचा धोका वाढला
राडारोड्यामुळे घाट रस्त्यावर पाणी साचून अपघाताचा धोका
कात्रज – कात्रज घाट रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यापूर्वीची कामे केली जातात. पण यंदा मे महिना निम्मा संपला तरी अद्याप ही कामे सुरू झालेली नाहीत. त्यात घाट रस्त्यावर राडारोडा टाकणे थांबलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या घाट रस्त्यावर पाणी साचून अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कात्रज जुना घाट रस्त्यावर याआधी पावसाळ्यापूर्वीची कामे नियमित केली जायची; पण या घाट रस्त्याला पर्यायी बोगदा निर्माण झाल्यानंतर घाट रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन बोगद्याचा रस्ता झाला असला तरी जुन्या घाट रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण ही अधिक आहे. त्यामुळे हा रस्ता सुद्धा वर्दळीचा बनला आहे. पूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असल्याने कामे पटापट व्हायची, पण आत हा दर्जा काढून घेतल्याने कामे खोळंबत आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून साधारण पावसाला सुरवात होते. पहिल्या वळवाच्या पावसातच रस्ते धुवून निघतात.अशावेळी रस्त्याच्याकडेला असणारे नाले साफ केले नसतील तर हे पाणी व चिखल रस्त्यावर येऊन अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे आतापासूनच ही कामे वेगाने सुरू होण्याची आवश्यकता आहे. अद्याप कामाचे टेंडरच निघाले नसल्याचे समजते. त्यामुळे अजून आठ दिवस तरी या प्रक्रियेला जातील त्यातच आचारसंहितेमुळे सुद्धा ही कामे रखडली आहेत.
नालेसफाईबराबेर राडारोडा टाकणाऱ्यांवरही कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. हा राडारोडा टाकणे थांबण्यासाठीही प्रशासनामार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे राडारोडा टाकणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी सुद्धा नागरिकांमधून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यापूर्वी रस्त्याच्या कडेचे गवत, माती काढण्यासाठी मजूर कार्यरत होते. मात्र, सध्या हे मजूर निवृत्त झाले आहेत, त्याजागी नव्या मजुरांची भरती केली नाही. त्यामुळे काही काम असेल तर निधी व टेंडर या प्रक्रियेवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे.