मार्केट यार्डात कर्मचारी, आडत्यांनाच बेशिस्त ः वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीत भर
पुणे – मार्केट यार्डात एक क्रमांकाच्या प्रवेशद्वारावर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांसह काही आडत्यांची वाहने पार्क केली जात आहेत. सध्या शेतमालासह आंब्याची मोठी आवक होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आहे. त्यातच कर्मचारी आणि आडत्यांच्या बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्क केलेल्या वाहनांमुळे त्यात आणखी भर पडत आहे.
सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून गुलटेकडी मार्केटयार्डात शेतमालासह आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दोन आठवड्यांपूर्वी आवक कमी असतानाही नियोजनाअभावी वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी तब्बल 2 हजार 60 लहान मोठ्या वाहनांतून शेतमालाची आवक झाली.
नियोजनामुळे आज फारशी वाहतूक कोंडी झाली नसल्याचे चित्र होते. बाजारात सध्या मोठ्या वाहनांतून आंबा दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. तर, दुसरीकडे बाजार समितीचे काही कर्मचारी आणि काही आडते प्रवेशद्वारावरच वाहने पार्क करतात. मुख्य प्रवेशद्वारावरून वाहने आत जात असल्याने या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहतूक कोंडीमुळे शेतमाल गाळ्यांवर पोहचण्यास उशीर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर, बाजार घटकांनाही वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यावर कारवाई होणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
बाजाराच्या प्रवेशद्वारावर कोणाचीही वाहने पार्क करू नये, अशा सूचना यापूर्वीही देण्यात आल्या आहेत. यापुढे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची वाहने प्रवेशद्वारावर पार्क केलेली आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबविण्यात येईल.
– बी.जे.देशमुख, प्रशासक, पुणे बाजार समिती