वाहनांची वेगमर्यादा 20 किमीने वाढली : शासनाचा “ग्रीन सिग्नल’
पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर (एक्स्प्रेस वे) आता वाहने सुसाट चालविण्यासाठी “ग्रीन सिग्नल’ मिळाला. नुकत्याच काढण्यात आलेल्या आदेशानुसार, महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा सुमारे 20 किमीने वाढविण्यात आली आहे. आता पुणे-मुंबई महामार्गावर चारचाकी वाहनाचा (फोर व्हीलर) वेग 120 किमी ठेवता येणार आहे. तर बसेससाठी 100 किमी आणि अवजड वाहनांना 80 किमी ठेवता येणार आहे. कारचा पूर्वीचा तासी वेग 100 होता.
द्रुतगती मार्गावर असणाऱ्या वाहनमर्यादेचे वारंवार उल्लंघन केले जात होते. त्यामुळे अपघातांमध्ये देखील वाढ झाली होती. अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा अतिवेग असल्याने अनेक काळापासून वेगमर्यादा वाढविण्यात आली नव्हती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाहनाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. यानुसार केंद्रीय मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे “एक्स्प्रेस वे’वर गाडी “सुसाट’ चालविण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी वाहनचालकांनी महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
वाहनचालकांकडून होत होती मागणी
मागील काही वर्षांत वाहनांच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 800 सीसी क्षमतेची वाहने कमी होऊन 1000 ते त्यापेक्षा जास्त क्षमतेची बाहने बाजारात दाखल झाली आहेत. तसेच “एसयूव्ही’ प्रकारातली वाहने वापरण्याकडे कल वाढला आहे. या वाहनांची वेग मर्यादा जास्त केली तरी ही वाहने नियंत्रणात राहतात. यामुळे वाहनचालकांकडून महामार्गावरील वेग मर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. तसेच या वाहनांमध्ये “सेफ्टी फिचर’ आंतरराष्ट्रीय दर्जाची असतात. दोन ते सहा एअर बॅग आणि अपघात सहन करण्याची क्षमता अशा वाहनांमध्ये आहे.
बाजारामध्ये नव्याने येणाऱ्या गाड्यांच्या परिस्थितीचा विचार करूनच हा निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. अतिवेगातील वाहनांवर यानुसारच कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, वेगमर्यादेसह नागरिकांना “लेन’च्या नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे.
– मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस