पुणे – जिल्ह्यातील प्रत्येक स्वच्छ गाव, सुंदर गाव बनविण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी गावातील वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर रंगकाम करून स्वच्छतेचे संदेश लिहिण्यास सुरुवात झाली आहे. दि. 1 जून ते 31 जुलै दरम्यान ही मोहीम सुरू राहणार असून यामध्ये प्रत्येक गावांनी स्वच्छतेचा, स्वागताचा संदेश असलेला फलक लावण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागाची स्वच्छता कायम राहण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये हे संदेश व रंगकाम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, दवाखाने, पोस्ट ऑफिस, बसस्थानकांच्या भिंती रंगवण्यात येणार आहे. यासाठीचा येणारा खर्च संबंधित ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून किंवा सीएसआरमधून करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गावातील रंगकामाचे फोटो जीओ टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मोहिमेत उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायत, तालुुका व जिल्हा यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. गावांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केलेल्या कामांची माहिती केंद्र शासनाच्या संगणक प्रणालीवर फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या फोटोंच्या आधारावर मूल्यमापन करून जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे.
नागरिकांना स्वच्छतेची माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी भिंतीवर स्वच्छतेविषयक संदेश या मोहिमेअंतर्गत लिहिले जाणार आहेत. ग्रामस्थांसोबतच विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभागी होण्याची आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी ठरवून दिलेलेच संदेश भिंतीवर रंगवावेत.
– अमर माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद