पुणे – योग्य नियोजन आणि पर्यटकांना दिलेल्या दर्जेदार सुविधा यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ फॉर्मात आले आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत सुरू करण्यात येणारी आरक्षणे लवकरच संपत आहेत, त्यामुळे या पर्यटकांना आणखी दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी आणखी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने सर्व पर्यटन केंद्राचा लेखाजोखा मागविला आहे. त्यानुसार तेथील सुविधांमध्ये आणखी वाढ होणार आहे.
पर्यटन केंद्रांच्या ठिकाणी खासगी हॉटेल चालक आणि अन्य व्यावसायिकांनी अक्षरश: धुमाकुळ घातला होता. हे व्यावसायिक मनमानी पद्धतीने दर आकारत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य पर्यटकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एमटीडीसीच्या माध्यमातून सवलतीच्या दरामध्ये सुविधा पुरवाव्यात अशा मागण्या पर्यटकांच्या माध्यमातून होत होत्या. त्यानुसार महामंडळाच्या वतीने त्याची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र, वाढत्या पर्यटकांच्या तुलनेत महामंडळाकडे असलेली केंद्रे अपुरी आहेत. त्याची दखल घेऊन खासगी ठेकेदारांना निवास आणि न्याहारी केंद्राचे ठेके देण्यात आले आहेत. त्यांच्या दर्जावर महामंडळाची नजर आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध होत असल्याने पर्यटकांची त्यांना चांगली पसंती मिळत आहे.
त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आगामी कालावधीत या पर्यटन केंद्रांना अधिक सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. त्यामुळे महामंडळाच्या वतीने राज्यभरातील सर्व पर्यटन केंद्रांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि त्यांचा अन्य लेखाजोखा मागविण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी काळात त्या केंद्रांना आणखी सुविधा पुरविणे महामंडळाला शक्य होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.