उस्मानाबाद – यंदाचे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान उस्मानाबादला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून देण्यात आलेले यजमानपदाचे निमंत्रण मंगळवारी संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील गोरोबा काकांच्या समाधी मंदिरात यजमान पदाचे निमंत्रण मोठ्या श्रध्देने संत गोरोबा कुंभार यांच्या चरणी मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने अर्पण करण्यात आले.
संत परंपरेत संतश्रेष्ठ गोरोबा कुंभार यांना अनन्य साधारण महत्व आहे. त्यांचे उपलब्ध असलेले साहित्य आणि गोरोबा कुंभार यांच्याविषयी अनेक संत महंतांनी लिहिलेले साहित्य यावरून संत परंपरेतील गोरोबा काकांचा मान सर्वज्ञात आहे. संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील गोरोबा काकांच्या भूमित आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे. त्यामुळे या संमेलनाच्या यजमान पदाचे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने संत गोरोबा कुंभार यांच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी तेर येथील सरपंच नवनाथ नाईकवाडी यांनी ग्रामस्थांच्यावतीने आयोजक संस्थेचा मंदिरात सत्कार केला.
हे संमेलन म्हणजे गोरोबाकाकांच्या समृध्द साहित्याचा वारसा अधिक सकसपणे साहित्य विश्वासमोर मांडण्याची संधी असल्याची भावना नितीन तावडे यांनी व्यक्त केली. यावेळी माधव इंगळे, एस. डी. कुंभार, अग्निवेश शिंदे, महेश पोतदार, आशिष मोदाणी, युवराज नळे, राजेंद्र अत्रे, प्रशांत पाटील, बालाजी तांबे, रवींद्र केसकर, दिलीप पाठक नारीकर, चंद्रसेन देशमुख, डॉ. सुभाष वाघ यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि तेर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तेर येथील ग्रामस्थ सर्व पातळीवर योगदान देतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.