नवी दिल्ली – भारतातील निवडणूक प्रक्रिया आता संपली आहे. त्यामुळे भारत आता लवकरच पाकिस्तानशी चर्चेची प्रक्रिया सुरू करेल असा विश्वास पाकिस्तानचे विदेश सचिव सोहेल मेहमुद यांनी व्यक्त केलाआहे. ते तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांची ही भेट पुर्ण खासगी स्वरूपाची आहे. त्यांची मुले भारतात शिकत आहेत. त्यांना भेटण्यासाठी ते येथे आले आहेत. दरम्यान आज ईद निमीत्त त्यांनी जामा मशिदीत नमाज अदा केली.
मेहमुद यांनी या आधी भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या यावेळच्या भारत दौऱ्यात ते भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार आहेत की नाही या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ते शुक्रवारी पुन्हा मायदेशी परतणार आहेत. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर बालाकोट येथे भारताने पाकिस्तानी हद्दीत केलेला हवाई हल्ला यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भारत भेट पुर्ण खासगी असली तरी महत्वाची मानली जात आहे.