कवठे येमाई येथे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन
रांजणगाव गणपती – केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेषतः तरुणवर्गांने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले, असे प्रतिपादन कारेगावचे सरपंच तथा भाजपाचे शिरुर-आंबेगाव विधानसभा अध्यक्ष अनिल नवले यांनी केले.
कवठे येमाई (ता. शिरुर) येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना, शेतीला व ग्रामीण भागाला पूरक योजना गावागावांतील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी काही वेळ समाजासाठी खर्च करावा. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बेट भागात भाजपाचे दिवसेंदिवस प्राबल्य वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सैरभैर विरोधक भाजपात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्याचे काम करीत आहेत. परत कार्यकर्त्यांच्या तक्रारी आल्या तर विरोधकांना त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा नवले यांनी दिला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सावित्रा थोरात, तुकाराम भोसले, संघटक माऊली साकोरे, भाऊसाहेब लंघे, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.