-नारायण ढेबे
सर्जेराव गजरू शिंगाडे हे मूळचे इंदापूर तालुक्यातील शेळगावचे. घरात शेतीची परंपरा, चांगली बागायती शेती, ऊस, ज्वारी, मका, गहू यासारखी पिके घेणारे हे कुटुंब पण ते चांगले शिकले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात शिक्षकाच्या नोकरीला लागले. चांगले इंग्रजी शिकवायचे पण माणूस गावाकडचा असल्याने रांगडी भाषा, उंचपुरा, शरीरयष्टी अगदी उत्तम, बोलण्यातला ग्रामीण बाज एकदम भारी वाटायचा.
मी शाळेत असताना मला शिंगाडेसर 8वी ते 10वी पर्यंत इंग्रजी शिकवायला असायचे. सातवीपर्यंत मराठी माध्यम, त्यामुळे मनात इंग्रजीबद्दल एक प्रकारची भीती असायची. त्यात अतिदुर्गम भाग असल्याने इथे मराठी देखील नीट जमायचे नाही. पानशेत हा पुण्यापासून जवळ असलेला भाग असला तरी इथे सोयी सुविधा अपूर्णच असायच्या. शिंगाडे सर वर्गात आले की सर्व वर्ग त्यांना घाबरायचा. त्यांनी एक आवाज टाकला की कमालीची वर्गात शांतता पसरायची. मग त्यांच्या लक्षात आले की, ते स्वतः काही तरी सांगून वातावरण हसतं खेळतं करायचे. विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजीची भीती पूर्ण घालवायचे. इंग्रजी सोपे करून सांगण्याची त्यांची पद्धत फार वेगळी होती.
प्रथमदर्शनी त्यांचा स्वभाव रागीट वाटायचा पण तो केवळ विद्यार्थ्यांना जरब बसण्यापुरताच असायचा. त्यांच्याजवळ जे जे विद्यार्थी जवळ केले त्यांना मात्र ते एखाद्या फणसातील गऱ्याच्या प्रमाणे वाटायचे. अतिशय हळुवार, प्रेमळ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. मी दहावीला असताना त्यांनी मला तंबी दिली होती. त्यांच्या घरी दोन तास इंग्रजी विषयाचा ते अभ्यास घ्यायचे. त्याचा मला दहावीला खूप फायदा झाला. पैसे घेऊन क्लास घ्यायला ते नकार द्यायचे. त्यांना पैशासाठी वेगळा क्लास ही संकल्पनाच पटायची नाही. एखाद्या विद्यार्थ्याची जबाबदारी जर शिंगाडे सरांनी घेतली तर मात्र ते कधीही मागे हटायचे नाहीत. तो विद्यार्थी किमान चांगले मार्क पाडून पुढे जायचाच. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये पैसे भरण्यास नसले तर स्वतः शिंगाडे सर ते भरायचे.
विद्यार्थी घडला पाहिजे, मुळात शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विकास होय हीच त्यांच्या शिक्षकी पेशाची गुरुकिल्ली होती. विद्यार्थी हा कुंभाराच्या मडक्याप्रमाणे कच्चा असतो आणि त्याला आकार देण्याचे काम हा शिक्षकच करतो यावर शिंगाडे सरांचा पूर्ण विश्वास. त्यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी हे चांगल्या स्थानावर कार्यरत आहेत.
त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा संग्राम बीएस्सी ऍग्री करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. तर मुलगी शिल्पा सासरी आहे. सरांची पत्नी अतिशय कष्टाळू आहे. आपल्या पतीला त्यांची साथ खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कधीही घरात असो वा शेतीत कष्ट करणे हे त्यांचे ब्रीद ठरलेले आहे. कमी शब्दांत बोलणे आणि नेमकेपणाने बोलणे हा सरांचा विशेष गुण म्हणावा लागेल. शाळेत असताना सणाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांना घरी बोलावून गोडधोड खायला घालण्यात शिंगाडे मॅडम यांना खूप बरे वाटायचे.
त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते विद्यार्थी पुढे गेले. ते नक्कीच आपले उद्याचे विश्व निर्माण करतील, असा मला पूर्ण विश्वास वाटतो. इंग्रजीचे दूध पिऊनदेखील आपल्या माय मराठीला ते कधीही विसरणार नाहीत. जेव्हा जेव्हा शिंगाडे सरांचे विद्यार्थी मागे वळून पाहतील तेव्हा तेव्हा त्यांना सरांची आठवण होईल आणि ती आठवण एक नवी उमेद, नवी ऊर्जा देऊन जाईल हे नक्कीच.