गॅस ट्रबल झाला म्हणजे माझी आजी गुबारा धरला म्हणायची. गुबारा धरला म्हणजे पोट फुगल्यासारखे होते, करपट ढेकर येतात. अपानवायू होतो म्हणजे हे सारे सोप्या शब्दात सांगायचे तर वारा सरणे किंवा पादायला होणे. असा त्रास म्हणजे सारखे ढेकर येणे किंवा वारा सरणे याचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. उतारवयात हे प्रमाण तुलनेने जास्त आढळते.वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जीवाणू प्रक्रिया. बद्धकोष्ठता असल्यावर मोठ्या आतड्यात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा, पण घाण वास येणारा असतो.
उपचार: आजकालच्या बैठ्या आणि कमी श्रमाच्या जीवन पध्दतीत पोटात गॅस होणे हे अगदी स्वाभाविक आहे. दिवसभरात आपल्याला काहीच शारीरिक श्रमाची कामे करावी लागत नाहीत. त्यामुळे काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. निदान दररोज चालण्याची सवय ठेवली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस-वायू होतो, असे वातुळ पदार्थ खाणे अगत्याने टाळले पाहिजे. जागरण टाळले पाहिजे.
जर वायूने फारच त्रास होत असेल आणि पोट फुगून तट्ट झाले असेल, तर अशा वेळी त्यावर एक सोपा उपाय करता येईल. गुडघे व कोपरावर ओणवे होऊन गुदद्वारात साधी लहान रबरी नळी सरकवायची. असे केल्याने आतील हवेला वाट मिळून ती बाहेर पडते. वर सरकणे हा हवेचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच पाण्यातून बुडबुडे वर येतात. या गुणधर्माचा वापर करून हवा गुदद्वाराच्या तोंडाशी आणता येते. आतड्याला पीळ पडला असल्यासही कधीकधी या उपायाचा गुण येतो व ऑपरेशन टळते. मात्र, नळी अर्ध्या वितीपेक्षा जास्त आत सरकवू नये. योगासनांपैकी पवनमुक्तासनासारखी काही आसने गॅस गुदद्वाराकडे आणण्यात उपयुक्त ठरतात.
वायू, गुबारा धरण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अति पाणी पिणे, आहारात बटाटा, रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी आहारात अधिक प्रमाणात समावेश असणे, यामुळे वायू होतो. तेव्हा अशा विशिष्ट पदार्थांचा आहारात समावेश जाणीवपूर्वक टाळावा.
वायू, गुबारा यांचा त्रास होणाऱ्यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात. गुबारा धरणे टाळण्यासाठी बैठे काम करणाऱ्यांनी पोटाच्या काही साध्या क्रिया कराव्यात. यापैकी एक साधी क्रिया पुढीलप्रमाणे. जेवणानंतर दीडदोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून धरावी आणि 5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार व नेहमी केल्यास गुबाऱ्याचा त्रास निश्चित कमी होतो. मात्र, बेंबी आत ओढून धरल्यास दुखत असेल तर आतील अवयवांना सूज आहे अशी शंका येणे साहजिक आहे अशा बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योगाभ्यासात पोटासाठी नौली, उड्डियान यांसारखे बरेच उपाय आहेत. या उपायांचा निश्चित उपयोग होतो.
अनुराधा पवार