दीडशे बालकांच्या मृत्यूचे प्रकरण
पाटणा – बिहारमध्ये ऍक्युट एन्सेफलाटीस सिंड्रोम नावाच्या तापामुळे राज्यातील दीडशे बालकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आज बिहार विधानसभेमध्ये प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाजच बंद पाडण्यात आले. या गोंधळामुळे सभापतींना कामकाज तहकुब करावे लागले. आज कामकाज सुरू होताच आरजेडीचे ललित यादव यांनी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या विषयावर कालच सभागृहात चर्चा झाली आहे आणि त्यावर सरकारने उत्तरही दिले आहे असे सभापतींनी सांगताच विरोधकांनी एकच गलका करून पांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनापुढे येत कामकाज हाणून पाडले. सदस्यांनी आपल्या जागेवर जाऊन घोषणाबाजी करावी अशी सुचना सभापतींनी त्यांना केली पण त्यांचे कोणीही ऐकले नाही. त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने प्रथम पंधरा मिनीटांसाठी आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकुब करावे लागले. या आजाराच्या प्रकारात सरकारचा निष्काळजीपणा समोर आला असून आजारग्रस्त भागातील रूग्णालयांमध्ये पुरेशी वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध नाही. डॉक्टरांची संख्याहीं अपुरी आहे.