मुंबई: खासगी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक नागरिकांना ७५ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील इंडस्ट्रियल पॉलिसी तयार करण्यात आली आहे, पण भाजप-सेनेचे नेते लेबर कॉण्ट्रक्टर असल्याने त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नेत्यांकडूनच बाहेरील लोकांना काम दिले जाते, यातून स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे मलिक म्हणाले.
शिवसेनेचे नेते सांगतात की मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं ठरलंय. तर मग काय ठरलं? ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगावे, असा टोला देखील नवाब मलिक लगावला आहे.
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून शिवसेना-भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे, यावर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता नाही, त्याबबात मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपा सोबत असलेला पक्ष भविष्यात संपल्याशिवाय राहत नाही अशी उदाहरणे आहेत, आणि हीच परिस्थिती शिवसेनेवर ओढवणार आहे, असा इशाराही मलिक यांनी दिला.