दिग्जिजय सिंग आणि संघाची प्रतिष्ठा पणाला
नवी दिल्ली (प्रतिनिधी)- मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उतरवून भाजपने तेलाच्या उकळत्या कढईत पाणी शिंपडले आहे. एवढेच नव्हे तर, भोपाळमध्ये दिग्विजय सिंग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मध्यप्रदेशातील भोपाळ हा मतदारसंघ सध्या अख्ख्या देशाच्या रडारवर आहे. कॉंग्रेसने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दहा वर्षांपर्यंत राज्याची धुरा सांभाळणारे दिग्विजय सिंग यांना मैदानात उतरविले आहे. तर, भाजपने महाराजाच्या विरोधात मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
यामुळे भोपाळच्या रणांगणात दिग्विजय सिंग यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेत आणि संघाच्या मुत्सद्यीपणामध्ये थेट लढाई आहे. भोपाळमध्ये भाजपची सत्ता मागील तीस वर्षांपासून आहे. 1989 पासून भाजपचा उमेदवार सतत येथून विजयी होत आला आहे. मध्यप्रदेशात कोणत्याही पक्षाचे सरकार असो भाजपला काहीही फरक पडला नाही.
मात्र, आताची लढाई तगडी आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सांगण्यावरून दिग्विजय सिंग यांनी भोपाळमधून लढणे मान्य केले होते. तर भाजपने विद्यमान खासदाराचे तिकीट कापून मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिली. साध्वी राजकारणात नवीन असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा माजी मुख्यमंत्री शिवराज चौहाण यांनी आपल्या हाती घेतली आहे. परंतु, ख-या अर्थाने संघच येथे सक्रीय आहे.
भाजपने मध्यप्रदेशातील अर्धा डझन खासदारांचे तिकीट कापले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सत्ता गमाविली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. तर लोकसभाध्यक्षा सुमित्र महाजन यांनी वयामुळे स्वतःहून माघार घेतली.
दुसरीकडे, पंधरा वर्षांनंतर राज्याची सत्ता हाती आल्यामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे कॉंग्रेसने सर्व जुन्या नेत्यांना मैदानात उतरविले आहे. यात, ज्योतिरादित्य सिंधिया, कांतीलाल भूरिया, अरूण यादव, अजय सिंग आणि मिनाक्षी नटराजन सामील आहेत.
भाजपकडून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर, प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग, माजी अध्यक्ष नंदकुमार चौहाण, प्रल्हाद पटेल, विरेंद्र खटीक, गणेश सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते मैदानात आहेत. मात्र, सर्वांचे लक्ष लागले आहे ते भोपाळमधील दिग्गी राजा आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यातील लढाईकडे.