रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रायगड येथे जाहीर सभा घेतली. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात नांदेड, सोलापूर, इचलरंजी, सातारा आणि पुण्यात जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यानंतर पाचवी सभा आज रायगड येथे पार पडली. ठाकरे यांनी या पूर्वीच्या आपल्या चारही सभांमध्ये केंद्रशासन तसेच राज्यशासनाच्या कारभाराची चिरफाड केली आहे.
दरम्यान, रायगडमध्ये राजठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. “नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर मतं मागत आहे. आजपर्यंत कधीच झालं नाही, की पाकिस्तनाचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान कोण असावा ह्यावर बोलत आहेत.काय कारण आहे की इम्रान खान ह्यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं? अटलजींच्या वेळेस पण कारगिल झालं होतं पण त्यांनी त्याचा कधी बाजार मांडला नाही जसा मोदी मांडत आहेत”, असे खडे बोल राज ठाकरेंनी सुनावले.