पाटण- बिहारमधील तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे शनिवारपर्यंत किमान 44 जणांचा मृत्यू झाल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील औरंगाबाद जिल्ह्यात 22, गयामध्ये 20 आणि नवाडा जिल्ह्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तीव्र उष्णतेच्या झळा आणि उष्णतेच्या लाटेमुळे झालेल्या या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी घोषित केली आहे. या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे आहे असे म्हणून त्यांनी संबंधित तिन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
बिहारमधील पाटणा, गया आणि भागलपूर सारख्या मोठ्य शहरांमध्ये शनिवारी तीव्र उष्णतेची लाट पसरली होती. पाटणामधील कमाल तापमान गेल्या 10 वर्षातील जून महिन्यातील सर्वाधिक म्हणजे 45.8 अंश इतके नोंदवले गेले. तर गया आणि भागलपूरमध्येही अनुक्रमे 45.2 आणि 41.5 अंश तापमान नोंदवले गेले. या तिन्ही शहरांमध्ये शनिवारचे तापमान नेहमीच्या दोन दिवसाच्या सरासरीपेक्षा अनुक्रमे 9.2, 7.6 आणि 5.5 अंशांनी जास्त होते.