वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 एप्रिल रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह भाजपशासित राज्यातील अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
यावेळीही मोदी हे अर्ज भरण्यापूर्वी 2014 प्रमाणेच 25 एप्रिलला लंका येथून दशाश्वमेध घाटापर्यंत सुमारे 10 किमी लांब रोड शो करुन शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिल रोजी बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरतील.
वाराणसीतील सुरूवातीच्या तीन निवडणुका वगळता 1984 पासून आतापर्यंत तीन दशकांहून अधिक काळापासून कॉंग्रेसने फक्त एकदाच विजय नोंदवला आहे. 1991 पासून आतापर्यंत फक्त 2004ची निवडणूक वगळता भाजपाचाच विजय झाला आहे.
वाराणसी मतदारसंघातील 2014 ची निवडणूक रंगतदार ठरली होती. कारण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद मोदी हे येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर दुसरीकडे त्यांना आव्हान देण्यासाठी आपचे अरविंद केजरीवाल हे दिल्लीवरुन वाराणसी येथे आले होते. मोदींनी केजरीवाल यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.