वाल्हे येथे 1 जुलै रोजी ज्ञानोबा माउलींच्या पालखीचे आगमण
वाल्हे- संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींचा पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे 1 जुलै रोजी मुक्कामी दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी मगंळवारी (दि. 11) येथील पालखी तळाची पाहणी केली.
यावेळी पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस नाईक संदीप पवार, एस. एस. उचाळे, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, तलाठी निलेश पाटील, ग्रामसेवक बबन चखाले, हनुमंत पवार, माजी सरपंच दत्तात्रय पवार, सुधाकर पवार, हमीद शेख यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सोहळ्याच्या मुक्कामापूर्वी येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यासह भुयारी मार्गातील साठलेल्या पावसाच्या पाण्याचे निरासरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तसेच संबंधित ठेकेदाराला तहसीलदारांनी सूचना केल्या. तसेच सुकलवाडी ते अंबाजीचीवाडी दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे डांबराने बुजवणे यासह पालखी तळाची स्वच्छता करून रस्त्यालगतची झाडे-झुडपे काढणे तसेच सुकलवाडी ते झिरपवस्ती रस्ता तयार करणे, ठिकठिकाणच्या वीजवाहक तारांचा झोल काढण्यासह वाहतुकीचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तर पालखी काळात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य, वीज, पाणी, शौचालय व इतर सोयी-सुविधाबाबत सखोल चर्चा केली.