मंचर -उन्हाच्या कडाक्यामुळे शेतीपिके पाणी भरूनही तग धरायला तयार नाहीत. शेती पिकांना दिलेल्या पाण्याचे उष्णतेमुळे शोषण होत आहे. बागायती क्षेत्रातील पिके ही उष्णतेमुळे हतबल झाली आहेत. विशेषतः ऊस पिकाचे शेंडे उष्णतेमुळे करपू लागले आहेत.
यावर्षी उन्हाच्या तीव्रतेचा मोठ्या प्रमाणात फटका शेती पिकांना बसू लागला आहे.उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम शेतीच्या पिकांवर होऊ न पिकाचे शेंडे सुकले आहेत. सध्या 40 ते 44 अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या तापमानाचा फटका पिकांना बसत असून पिके ही हतबल झाली आहेत. सध्या पिकाला पाणी दिल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी सुकून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार पिकांना पाणी द्यावे लागत आहे. उसाला पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पिकाचे शेंडे सुकलेले दिसतात. उष्णतेमुळे पिके हतबल झाली असून शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.
आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये अनेक धरण साठ्यातील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बागायती झाले आहे. हा परिसर सुजलाम-सुफलाम आहे. उष्णता सर्वच शेती पिकांना मारक ठरत असून निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. याला जबाबदार मानव असून मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि वाढलेले प्रदूषण यामुळे उष्णतेत वाढ झाली असून येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.