दक्ष नागरिकाने कळवले पोलीस नियंत्रण कक्षाला
पुणे,दि.18- पैशाच्या व्यवहारातून एका बांधकाम फर्मच्या माजी संचालकाचे आठ जणांनी अपहरण केले. मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकाने ही घटना पहाताच तातडीने पोलीस नियंत्रण कक्षास याची खबर दिली. यानंतर तातडीने सूत्रे हालल्याने संबंधीत संचालकास चतुश्रृंगी पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून सोडवले. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मार्थी व्यंकटत्नम दिनकर(40,रा.सोपानबाग, बालेवाडी) असे अपहरण झालेल्या व्यक्तीने नाव आहे. त्यांच्या अपहरणप्रकरणी उत्तम राजाराम चोरगे(21,रा.वेल्हा), रोहीत पंढरीनाथ चोरगे(19,रा.कात्रज), संताजी तानाजी भोसले(21,रा.विंजर), अक्षय तुकाराम धरपाळे(19,रा.वांजळे), मुकेश राजाराम आसवले(22,रा.वडगाव शेरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे साथीदार तेजस रविंद्र लिम्हण, मनोज कजबेकर यांच्या विरुध्दही अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी हे 2016 मध्ये बंडगार्डन येथील शिवविश्व डेव्हलपर्स प्रा.लि.मध्ये संचालक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी वाघोलीतील भावडीगाव येथील जमीनी संदर्भात व्यवहार केला होता. या व्यवहारासंर्दात ते फोनवर बाणेर येथील आर.के.कंन्सलटंट येथे मुकेश व मनोज यांच्याशी चर्चा करत होते. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांचे सहा साथीदार तेथे दाखल झाले. त्यांनी फिर्यादीचा फोन हिसकावून त्यांना जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले. यानंतर त्यांच्या डोळ्याला रुमाल बांधून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ही घटना तेथील एका नागरिकाने बघितली. त्याने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यानंतर पोलीस नियंक्षण कक्षातून चतुश्रृंगी पोलीस ठाण्यास खबर देण्यात आली. त्यानूसार पोलिसांनी फिर्यादीची सुटका करत आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दोडमिसे करत आहेत.