बावडा- सध्या इंदापूर तालुक्यात दुष्काळाने जनता होरपळून गेली आहे. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना चारा व पाणी, त्याचबरोबर मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे हातात पैसा नाही. अशा अनेक अडचणीतून बिकट वाट काढत जनता कशीतरी चालढकल करत आहे. अशातच आजी, माजी आमदार तालुक्यातून दुष्काळी दौऱ्यांच्या निमित्ताने गावोगावी जाऊन भेटी, गाठी घेत आहेत. भेटून जनतेला आश्वासने देत आहे. पण हे विधानसभेसाठी तर नाही ना, अशी शंकेची पाल नागरिकांच्या मनात चुकचुकत आहे. इंदापूर तालुक्यातील आजी- माजी आमदारांकडून दुष्काळी दौरा सुरू आहे. या दौऱ्यातून अवघ्या चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेची मशागत केली जात आहे.
इंदापूर तालुका म्हणजे नेहमीच विविध कारणांतून निर्माण केलेल्या आणि झालेल्या चर्चेसाठी प्रसिद्धच आहे. कधी राजकीय घडामोडींसाठी तर कधी दुष्काळासाठी, तर कधी अन्य कारणांसाठी. पण काहीही असो, यंदा तालुक्यातील दुष्काळ हा जनतेला जेरीस आणणारा ठरला. दुष्काळाची दाहकता “न भूतो न भविष्याती’ अशी आहे. जुन्या जाणकारांच्या मते 1972 साली पडलेल्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ भयंकर आहे.
तेव्हा मोजक्याच गोष्टींची कमतरता होती. यंदा पाणी नाही, अन्नधान्य पुरेसे नाही, जनावरांना हिरवाच काय पण सुका चारा मिळणेही मुश्किल झाले आहे. दुभत्या जनावरांचे हाल बघवत नाहीत. शेतात उभी पिकेच नसल्याने शेत मजुरांच्या हाताला काम नाही. शेतकरी हवालदिल झाल्याने मारामार होऊन बसली आहे. या सर्व गोष्टींना कुठे का होईना राजकारणच जबाबदार असल्याचे जनतेचे मत आहे. भलेही ते स्पष्टपणे याची वाच्यता करत नाहीत. परंतु दबक्या आवाजात बोलत आहेत. तालुक्याची वाट खऱ्या अर्थाने घाणेरड्या राजकारणामुळेच लागली आहे, असा सूर उमटत आहे. राजकारणासाठी जनतेचा वापर करायचा, राजकारणात पाय रोवले की जनता वाऱ्यावर सोडून मोकळे व्हायचे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत कुरघोड्याचे राजकारण करायचे, ही चाल जनता अनुभवत आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आजी, माजी आमदार तालुक्यातून दुष्काळी स्थिती पाहण्याच्या निमित्ताने चार महिन्यांवर येवून ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. हेच नेते आजपर्यंत तालुक्यावर राज्य करत आले आहेत. परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याने काही केले नाही आणि त्याने काही केले नाही म्हणत एकमेकांवर तोंडसुख घेतात. यापुढे मला साथ दिली तर मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ठणकावून विधानसभेसाठी मतांचीच मागणी करत आहेत. दुष्काळी दौऱ्यानिमित्त आश्वासने देत फिरण्यापेक्षा आतापर्यंत तालुक्याची सत्ता तर तुमच्याच हाती असताना इथून पुढची आश्वासने देण्यापेक्षा आजपर्यंत का कोणी हात धरले होते का कोण तालुक्याच्या विकासाला आडवे येत होते. पण नाचता येईना अंगण वाकडे याप्रमाणे काम करायचेच नाही. तालुक्याचा विकास करायचाच नाही. करायचेय फक्त राजकारणच. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात दिवसा धूळफेक करण्यात सर्वच राजकारणी यशस्वी जरी झाले असले तरी जनता आजही जागरूक आहे, याचाही विचार जाणत्या नेत्यांनी यापुढे करावा, अशी चर्चा तालुक्यातून होत आहे.
- दुष्काळी दौरे काढले मात्र उपाययोजना काय?
इंदापूर तालुक्यात आजी, माजी आमदार मंडळींसह प्रमुख नेते मंडळींनी दुष्काळी परिस्थिती पाहिली. याचे नियोजन असे केले की, जसे यांना तालुक्यात दुष्काळ आहे की नाही हेच ठाऊक नव्हते. दुष्काळी दौरे काढून झाल्यानंतर त्यावर उपाययोजना काय केल्या. हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे. आजी, माजी आमदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केला जात आहे. आता हा पाठपुरावा दोन्ही नेत्यांचा चार महिन्यांतच जाहिरनामा, वचनपूर्ती होणार आहे. त्यातून चिखलफेक सुरू होणार असल्यामुळे दुष्काळातून बाहेर पडणाऱ्या जनतेला पुन्हा चिखलफेकीचा अनुभव पाहावयास मिळणार आहे.