नवी दिल्ली – अखेर मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. 18 ते 19 मे रोजीपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार अखेर आज मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे. साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला असल्याने देशातील बळीराजा सुखावला आहे.
दरम्यान, दरवर्षी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होते त्यानंतर बंगालच्या उपसागरावरून हे वारेउत्तरेकडे पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांकडे सरकतात. त्यानंतर मान्सून केरळमध्ये आणि पुढे कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो.