बाजरीच्या कणसांत पाणी शिरले, शेतकरी चिंतेत, नुकसान भरपाईची मागणी
लाखणगाव (पुणे) -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, लाखणगाव, देवगाव, पोंदेवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेल्या बाजरीच्या कणसांत पाणी घुसल्याने बाजरीचे नुकसान झाले आहे.
ऊस, कडवळ, तरकारी अशी अनेक पिके पावसाच्या पाण्यामुळे बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी पाच ते साडेसहा या दरम्यान दीड तास सुरू असलेल्या वळवाच्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली बाजरीची कणसे भिजली आहेत. कणसाच्या खालून पाणी गेले आहे. अनेक पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.