नागपूर – वैद्यकीय प्रवेशासाठीच्या “नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट) परिक्षेत 720 पैकी 650 गुणांची अपेक्षा असलेल्या महाराष्ट्रातील एका विद्यार्थीनीला चक्क शून्य गुण मिळाल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गुण फेरतपासणीसाठी याचिका दाखल केली आहे. वसुंधरा भोजने असे या युवतीचे नाव असून ती अमरावतीची आहे.
विशेष म्हणजे, याच परिक्षेत ओडिशाच्या शोएब आफताबने पैकीच्या पैकी 720 गुण मिळाल्याने त्याला देशपातळीवरील पहिला क्रमांक देण्यात आला होता. मात्र, आता असेही समजत आहे की, दिल्लीच्या आकांक्षा सिंगनेही 720 गुण मिळवल्याने तिलाही देशपातळीवरील प्रथम क्रमांक जाहीर केला जाणे अपेक्षित आहे. यापेक्षाही महत्त्वाची आणि संतापजनक बाब म्हणजे, गुणांच्या फेरतपासणीची कोणतीही यंत्रणा अथवा सुविधा “नीट’ परिक्षेच्या संयोजकांकडे नसल्याने, वसुंधरा भोजने यांना न्यायलयात दाद मागण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. “नीट’च्या अशा भोंगळ कारभारामुले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीवर गंभीर परिणाम होत असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोजने यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत नागपूर खंडपीठातील न्या. ए. एस. चांदुरकर यांनी “नीट’ परिक्षेची संयोजक संस्था नॅशनल टेस्टींग एजन्सीसह, केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना नोटीस जारी केली आहे. भोजने यांनी आपल्या उत्तरपत्रिकेची तपासणी तज्ज्ञ व्यक्तीकडून करण्याची मागणी केली आहे. वसुंधरा भोजने यांनी सांगितले की, शालेय जीवनापासून सातत्याने उत्तम गुण संपादन केलेल्या माझ्यासारख्या असंख्य मुलींना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. “नीट’कडून प्रश्नपत्रिकेची “आन्सर की’ प्रकाशित केली जाते. त्याच्याशी मी दिलेल्या उत्तरांची तुलना केल्यास, मला 650 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना शून्य गुण दिले गेल्याने, मला प्रचंड धक्का बसला आहे.
दरम्यान, असे अनेक प्रकार घडूनही केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालय याबाबत काहीच करत नसल्याने नाराजीत भरच पडत आहे. या याचिकेच्या निकालाकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.