जरा जपून … आला दिशाहीन तेजी-मंदीचा काळ (भाग-१)
केवळ आकड्यांची करमणूक
आता एक गोष्ट इथं वाचकांनी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, प्रत्येक भावात कोणीतरी घेणारा असतो आणि कोणीतरी विकणारा. घेणाऱ्यास तो भाव खरेदीसाठी रास्त वाटत असतो अन् तसा विकणाऱ्यास देखील विक्रीसाठी आणि म्हणूनच प्रत्येक पैशागणिक त्यात ट्रेड (व्यवहार) होत असतो. आपण सर्वच जाणतो की, कंपनी चालवण्यास आलेल्या अपयशामुळं ही कंपनी १७ एप्रिल पासून बंद आहे. आता या कंपनीच्या शेअर्समध्ये असं काय झालं की कंपनीच्या शेअर्सनी अचानक आतापर्यंतची सर्वांत मोठी उलाढाल नोंदवत (शेअर्सच्या संख्येनुसार) इतकी वाढ नोंदवली ? याचं प्रमुख कारण म्हणजे २२ एप्रिल रोजी राष्ट्रीय शेअर बाजारानं जाहीर केलेलं होतं की, २७ जून नंतर या कंपनीचे वायदे बाजारातील सर्व व्यवहार बंद करण्यात येतील. त्यामुळं अनेक लोकांनी या शेअर्समध्ये शॉर्ट म्हणजे विक्रीच्या पोझिशन्स घेतल्या. आपआपल्या कर्जवसुलीसाठी १८ जून रोजी एसबीआय समवेत इतर २६ बँकांनी एनसीएलटी कडं धाव घेतली व त्याबाबत कंपनीच्या दृष्टीनं कांही पॉझिटिव्ह बातमी यायच्या अपेक्षेनं हळूहळू १९ जून पासूनच वायदे बाजारात खरेदी जोर धरू लागली.
आता, २० जून रोजी, शॉर्ट पोझिशन्स बंद (Square-off) करण्यासाठी मंदीवाल्यांनी देखील वायदे बाजारात खरेदी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळं अचानक मागणी वाढू लागली हे पाहून ट्रेडिंग करणारे देखील तेजीच्या पोझिशन्स घेऊ लागले व विकणारे त्या शेअर्समध्ये तेजी येत आहे हे पाहून आपली विक्रीची किंमत वरती सरकवू लागले, मात्र मागणीसमोर पुरवठा कमी पडत असल्यानं खरेदीदार हे समोर मिळणाऱ्या चढ्या भावात खरेदी करू लागले व अशाप्रकारे भाव वाढत गेले आणि कांही ट्रेडर्स हे दिवसभरात पुन्हा भाव खाली येतील व आपल्याला नफा कमावता येईल या अविर्भावात शॉर्ट पोझिशन्स घेत गेले की. परंतु भाव खाली न आल्यानं, मंदीवाल्यांना शेवटच्या पाच मिनिटात इंट्रा-डे चे सौदे बंद (Square-off) करण्यासाठी समोर असलेल्या वाटेल त्या भावात खरेदी करून पोझिशन्स कापाव्या लागल्या व त्या दिवसातील सर्वोच्च भाव नोंदवला गेला.
दुसऱ्या दिवशी देखील या शेअर्सनं तेजी अनुभवली. एकूणच आताच्या घडीला या कंपनीवर ३६५०० कोटी रुपयांचं कर्ज असून त्यासमोर संपत्ती अगदी किरकोळ असल्यानं कर्जाची वसूली कशी करायची हा यक्ष-प्रश्न बँकांसमोर ठाकलेला आहे. मागील वर्षात कंपनीनं ६३६ कोटी रुपयांचे नुकसान जाहीर केलेलं असून, या वर्षात संपलेल्या आर्थिक वर्षाचा निकाल कंपनीनं अजूनही जाहीर केलेला नाहीय. जाता जाता अजून एक मजेशीर बाब सांगावीशी वाटते ती म्हणजे या कंपनीचा वायदे बाजारातील भाव आहे ४९ रु. व सर्वसाधारण शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा भाव आहे ७२.६ रु. आणि येत्या गुरुवारी म्हणजेच २७ रोजी, दोन्हीचे भाव एकच असणार आहेत. त्यामुळं आता असणारी तब्बल ३२ टक्क्यांची तफावत ही हळूहळू कमी होत शून्य होणार आहे. त्यामुळं गुंतवणूक करताना अशा कंपन्यांपासून चार हात दूर राहणंच इष्ट ठरतं, आकड्यांमुळं करमणूक होते आहे. सध्या आपल्या शिक्षण मंडळाच्या आकड्यांसंबंधी निर्णयावरून देखील असंच काही होत आहे.