सातारा – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा परिषदेने करोना प्रतिबंधासाठी सुरु केलेली आयुष्यवर्धिनी योजना निश्चितच फलदायी ठरेल. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सव्वासहा लाख कुटुंबांना ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधांचे वाटप करण्याचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे, असे मत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने “अर्सेनिकम अल्बम 30′ या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या होमिओपॅथी गोळ्या वाटपाच्या शुभारंभप्रसंगी सिंह बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ. सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह खातेप्रमुख, समितीचे सदस्य, मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना यश येत असले तरी वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. मृत्यूदर कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आले असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन या लढ्यात प्रशासनाचे मनोबल वाढवावे, असे आवाहन शेखर सिंह यांनी केले.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यात करोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्हा प्रशासन करोनाविरोधातील लढाई लढत आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने आयुष्यवर्धिनी योजना राबवण्यात रेत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सव्वा सहा लाख कुटुंबे गृहित धरुन त्यांना ऍलोपॅथी, होमिओपॅथी औषधे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रदीप विधाते यांनी सांगितले.