सातारा –करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्थापन करण्यात आलेल्या करोना नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत तब्बल शंभर दिवस कोणतीही सरकारी अथवा वैयक्तिक सुट्टी न घेता आपली लढाई सुरू ठेवली आहे. करोनाला आपल्याला हरवायचे आहे हेच ध्येय घेऊन सलग शंभर दिवस जिल्हा परिषदेच्या नियंत्रण कक्षातील करोना योद्धे लढत आहेत.
करोनाचे संकट गडद असताना जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करुन नागरिकांना भयमुक्त करण्याचा प्रयत्न केला. संजय भागवत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत गेली शंभर दिवस सुटी न घेता कामकाज सुरु आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग मोठा आहे. या कक्षाच्या माध्यमातून विलगीकरण करण्यात आलेल्या शेकडो नागरिकांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
जिल्ह्याची संपूर्ण परिस्थिती लक्षात येण्यासाठी आवश्यक माहितीचे संकलन करत शेकडो प्रकारचे अहवाल कर्मचारी रात्रंदिवस तयार करून पुणे येथील आयुक्त कार्यालय, आरोग्य उपसंचालक कार्यालयाला कळवितात. त्यानुसार नियोजनात तातडीने बदल करण्यात येतात. प्रबोधनासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची माहिती पुस्तके, माहितीपत्रके छापण्यात आली. जनतेने काळजी कशी घ्यावी याचे प्रबोधन या कक्षाच्या माध्यमातून केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील सर्व अधिकारी तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
जिल्हा परिषदेतील कक्षात व्हिडिओ कॉन्फरन्स हॉल निर्माण करण्यात आला आहे. त्याद्वारे विविध ठिकाणी संपर्क साधला जातो. ंप्रत्येक तालुकानिहाय कर्मचारी नेमून आजारी व्यक्तीशी संपर्क साधून मार्गदर्शन केले जाते. वरिष्ठ अधिकारी याबाबत वारंवार आढावा घेतात.
माहिती तंत्रज्ञान कक्ष, जिल्हा परिषद मुद्रणालय यांचेही सहकार्य लाभत आहे. नूतन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येते. रोज सुमारे साडेसात लाख मेसेज करून विषाणूपासून बचावासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाहणे अशा सूचना विविध प्रकारे जिल्ह्यात सातत्याने पोहचवल्या जातात. आयुर्वेदिक उपायांबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, माता- बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा साथ रोग तज्ज्ञ डॉ. सुभाष औंधकर करोना प्रतिबंधाच्या नियोजनासाठी अविरत कष्ट घेत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे हेदेखील वारंवार नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असतात.सुट्टी न घेता सलग 100 दिवस काम करुन आरोय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
करोनाची लढाई जिंकण्याचे ध्येय घेऊन जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना “अर्सेनिक अल्बम 30′ गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. आजवर दोन लाखांहून अधिक मास्क तयार करण्यात आले आहेत. सुट्टी न घेता सततच्या कामामुळे ताण तणाव जाणवतो. मात्र, देशकार्यासाठी काम करणे अत्यंत समाधानकारक वाटत आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करोनाच्या लढाईत केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असून या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे.
डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा