गेल्या वर्षीच्या पावसाची किमया; सध्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी पाणी
लोणंद (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण, पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती व इंदापूर, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेली नीरा नदी व नदीवरील धरणांची आजची स्थिती समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. मागील वर्षी आजच्या दिवशी फक्त 3.18 टक्के पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी जून महिना संपत आला तरी नीरा खोऱ्यात अजून तरी सुमारे 23.20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो बोनस पाऊस शेतकऱ्यांना शेती उत्पादनात बोनस देऊन गेला.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नीरेच्या खोऱ्यात तब्बल 11.21 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी पावसाने सुरवातीला चांगलीच ओढ दिली. यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले. धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. त्यामुळे सध्या वीर धरणातून नीरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाऊस उशिरा आल्यानंतर परतीचा पाऊसही जास्त बरसला. तो नीरा खोऱ्याला एक बोनस देऊन गेला. सुरवातीला कमी पडलेल्या पावसाने नंतर सरासरी ओलांडली. उशिरा आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याचा वापर कमी झाला. त्यामुळे रब्बी हंगामात पाण्याची मागणी घटली होती. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी नीरेच्या खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर धरणात पाणी शिल्लक आहे.
आज दि. 25 जून रोजी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणात 1.94 टीएमसी म्हणजे एकूण क्षमतेच्या 16 टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरणत 6.250 टीएमसी म्हणजेच क्षमतेच्या 27.59 टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणात 2.110 टीएमसी म्हणजेच क्षमतेच्या 22.42 टक्के पाणीसाठा आहे. तर गुंजवणी धरणत 0.970 टीएमसी म्हणजेच क्षमतेच्या 24.57 टक्के एवढे पाणी शिल्लक आहे.
सध्या वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून 675 क्यूसेक तर उजव्या कालव्यातून 852 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नीरेच्या खोऱ्यात एकूण 11.214 टीएमसी एवढा पाणीसाठा असून तो एकूण साठ्याच्या 23.20 टक्के एवढा आहे. मागील वर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात केवळ 1.839 टीएमसी म्हणजेच 3.18 टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नीरा पाटबंधारे विभागाचे तांत्रिक अधिकारी दतात्रय शिंदे यांनी दिली.