पुणे – जिल्हा परिषदेतील वर्ग 3 संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय किंवा विनंती बदली झाली आहे, यातील काहींचा जुन्या ठिकाणाहून पाय निघत नसल्याचे समोर आले आहे. पण, त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून दिलेल्या सूचनांनुसार पुणे जिल्हा परिषदेतील वर्ग 3 या संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांची समुपदेशाने बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार त्यांनी बदलीच्या ठिकाणी रूजू होणे बंधनकारक होते. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगनमताने कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. ही बाब सीईओ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांनी बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच संबधित कर्मचाऱ्याचे वेतन 1 ऑगस्टपासून आपल्या कार्यालयामार्फत देऊ नये, असा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर संबंधित कार्यवाहीचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा, असेही आदेशामध्ये म्हटले आहे.
जुन्या हितसंबंधांमुळे बाधा
बदल्या करूनही काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रूजू न होणे हे जिल्हा परिषदेत नवीन नाही. बदली करूनही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी एका विभागाचे वेतन घेतात आणि काम दुसऱ्या विभागात करतात. त्यामुळे अधिकारीही “चलता है, चलने दो’, असे म्हणत ओरड होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करत नाहीत. काही जणांचे जुन्या हित-संबंधांमुळे विभागातून पायही निघत नाही.