पुणे – देशातील महामार्गांचे जाळे विस्तारत असताना दुसऱ्या बाजूला अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. यात मृत्यूमुखी पावणाऱ्यांमध्ये युवकांचीच संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. या वाहनांचा अतिवेग कारणीभूत असल्याचे प्रमुख कारण आहे.
देशातील वाढत्या अपघातांबाबत रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. अनेक भाषणे, सभा आणि मुलाखतींमध्ये त्यांनी अपघाती मृत्यूंचे आकडे सातत्याने जनतेसमोर मांडले आहेत. काही ठिकाणी प्रशासकीय त्रुटी, रस्त्यांची परिस्थिती, माहितीफलकांचा अभाव या बाबी अपघातांना कारणीभूत ठरतात. तरीही, प्रामुख्याने वाहनाचा वेग नियंत्रित न झाल्याने अपघात होत असल्याचे निरीक्षण सातत्याने मांडले जात आहे.
पण, तरीही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. देशातील महामार्ग विस्तारीकरण, नवी रस्ते बांधणी वेगाने होत आहे. अशा वेळी अपघातांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. पण, रस्ते जसजसे वेगवान होत आहेत, त्याच वेगाने अपघातही वाढत आहेत.
अपघात टाळणे शक्य, पण कसे?
सायकल किंवा दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे
चारचाकी चालवताना सीट बेल्ट लावणे आवश्यक
मद्यपान करुन वाहन न चालवणे
अधिक वेगाने वाहन न चालवणे
वाहतूक नियमांचे पालन करणे
अपघातांना जबाबदार प्रशासकीय कारणे
रस्त्यावरील वाहनांसोबत पादचारी आणि जनावरांची गर्दी
पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग/लेन उपलब्ध नसणे
जुनी आणि मेन्टेनन्स नसलेली वाहने
रस्त्यावर अति प्रमाणात दुचाकी वाहनांची वर्दळ
खोदलेले-खड्डेयुक्त रस्ते, स्ट्रीट लाइट्सचा अभाव, रस्त्यांचा सदोष ले-आऊट, सदोष गतिरोधक, अव्यवस्थित पद्धतीचे चौरस्ते
धोक्याच्या वळणाच्या ठिकाणी सूचना फलक नसणे
अपघात का वाढत आहेत?
अपघातांस कारणीभूत ठरणारे घटक टाळल्यास ही संख्या कमी करता येणे शक्य आहे. भारतात अपघातांचे दर वाढत असून रस्त्यावरील वाढलेली रहदारी, वाहनसंख्या, वाहतूकसंबंधी नियमांचे योग्य पालन न होणे, सर्वसामान्यांमध्ये वाहतूक नियमांबद्दल अज्ञान यामुळे अपघात वाढत आहेत.